मी पाहिलेले अटलजी – डॉ. रघुनाथ माशेलकर


अटलजी आज आपल्यात नाहीत हे पटत नाही. पण मी म्हणेन की, अटलजी ही एक व्यक्ती नव्हती, एक संस्था होती, एक विचार होता, एक संदेश होता. म्हणून ते चिरंतन आहेत आणि राहतील. अटलजी पंतप्रधान असतांना मी सी.एस.आय.आर च्या ४० राष्ट्रीय प्रयोगशाळांचा प्रमुख होतो. अटलजी पंतप्रधान या नात्याने सी.एस.आय.आर सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यामुळे मी त्यांना जवळून पाहिलं आहे.

अटलजींचा मला प्रचंड पाठिबा होता. त्यामुळे सी.एस.आय.आर या संस्थेत मी आमूलाग्र बदल करू शकलो. डॉ. जयंत नारळीकरांच्या ‘सायंटिफिक एज’ या २००३ साली लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी २० व्या शतकातील भारतीय विज्ञान व तंत्रज्ञानातील १० सर्वात महत्वपूर्ण अशा पराक्रमांची यादी केली आहे. त्यांत रामानुजन, साहा, एस.एन.बोस, रमण, रामचंद्रन या शांस्त्रज्ञाशिवाय हरितक्रांती, अणुऊर्जा, अंतराळ क्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख केला आहे. पण दहावी घटना आहे मी सी.एस.आय.आर चा महासंचालक असतांना त्या संस्थेचं झालेलं परिवर्तन. त्यासाठी मला कठोर निर्णय घ्यावे लागले. काही प्रयोगशाळा बंद कराव्या लागल्या. या संस्थेच्या इतिहासात हे प्रथम घडलं. केवळ गुणवत्तेलाच महत्व व प्राधान्य दिलं. परिणामी अनेक गटांकडून विरोध झाला. पण अटलजीं माझ्यामागे ठामपणे उभे राहिले. म्हणूनच या परिवर्तनाचं सर्व श्रेय मी त्यांना देतो.

अटलजींचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. काही कठीण समस्या आल्या की माशेलकर समिती नेमा असं ते सांगत. नॅशनल ऑटो फ्युएल पॉलिसी असो की रीजनल इंजिनीरिंग कॉलेजेस मध्ये परिवर्तन करून नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी करणं असो, भारताची औषधनियंत्रण विषयक यंत्रणा बदलायची असो की, भारताच्या पेटंट कायद्यात बदल करायचा असो या सर्व समित्यांच्या अध्यक्षपदी माशेलकरच हवेत असं त्यांनी आग्रहपूर्वक सांगितलं.

३ जानेवारी २००० रोजी अटलजींनी इंडियन सायन्स काँग्रेसचं पुण्यात उद्घाटन केलं. जवळजवळ ५००० शास्त्रज्ञ त्याला हजर होते. नोबेल विजेते शास्त्रज्ञ आले होते. डॉ कलामांसारखे शास्त्रज्ञ ही आले होते. पुण्यातील त्या सायन्स काँग्रेसची अजून लोक आठवण काढतात. या सभेत अटलजींनी एक अत्यंत प्रेरणादायी घोषणा केली. ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान.’ तेव्हा सर्व सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
माझं अध्यक्षीय भाषण होतं ‘नवं पंचाशीलः नव्या सहस्रकासाठी’ ते पंचशील होतं बालकेंद्रित शिक्षण , स्त्रीकेंद्रित परिवार, मानवकेंद्रित विकास, ज्ञानाधिष्ठित समाज आणि नवसर्जनशील भारत. बालकेंद्रित शिक्षणाचा मुद्दा मांडताना मी माझ्या मुंबईतील युनियन हायस्कूलमधील भावे सरांनी केलेल्या प्रयोगाचा उल्लेख केला आणि त्यामुळे माझं सार आयुष्य कसं बदललं याबद्दल बोललो होतो.

उद्घाटनाचा समारंभानंतरच्यावेळी भोजन होतं. त्यावेळी अटलजींबरोबर मी आणि दोन नोबेल विजेते असे आम्ही एकत्र होतो. प्रोफेसर मेनन, डॉ. कलाम, शरदराव पवार होते. माझ्या भाषणातील भावे सरांच्या नावाचा उल्लेख सर्वांना भावला . पण नोबेल विजेते लेन व अर्नस्ट म्हणाले की असे शिक्षक युरोपमध्येही दिसत नाहीत. अटलजी माझ्याकडे वळले आणि मला म्हणाले, ‘माशेलकरजी आपको पता है की, आजकल भावे सर क्यों नही दिखते हैं?’ मी म्हटलं, ‘नही सर’. तेव्हा अटलजीं म्हणाले ‘क्योंकी आज उनको समाज में प्रतिष्ठा नहीं है’. केवढे अर्थपूर्ण उद्गार होते ते ! नंतर मला कळलं की अटलजींचे वडील शिक्षक होते. म्हणजे हे अनुभवाचे बोल होते.
अटलजींच्या मनातील ही खंत दूर करणं, त्यांना अभिप्रेत असलेला सन्मान पुन्हा शिक्षकांना मिळवून देणं किंवा तसा सन्मान समाजाने शिक्षकांना द्यावा अशा क्षमतेचे अध्यापक घडवणं ही त्यांना वेगळी आदरांजली ठरेल.

अटलजींनी एक दुसरी आठवण आहे. ११ में १९९८ रोजी सी.एस.आय.आर च्या ४० प्रयोगशाळा प्रमुखांची बंगलोरमध्ये वार्षिक परिषद होती. त्याच दिवशी एन ए एल या आमच्या प्रयोगशाळेने तयार केलेल्या चार आसनी ‘हंसा’ विमानाचं पहिलं उड्डाण झालं. दुपारी बातमी आली की डी.आर.डी.ओ. ने ‘त्रिशूल’ या मिसाईलचं पहिलं उड्डाण केलं होतं. आणि संध्याकाळी बातमी आली की पोखरण मध्ये भारताने अणुचाचणी घेतली ! त्यानंतर जूनमध्ये अटलजींच्या हस्ते दिल्लीत शांती स्वरूप भटनागर पारितोषिक वितरणाचा समारंभ झाला. मी व डॉ. मुरली मनोहर जोशी अटलजींच्या उजव्या व डाव्या बाजूला बसलो होतो. आम्ही दोघांनी अटलजींना भारताने एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचं महान प्रदर्शन एकाच दिवसात ११ मे ला कसं घडलं हे सांगितलं. आम्ही त्यांना सुचवलं कीं आपण ११ मे हा ‘टेक्नॉलॉजी डे’ म्हणजे ‘तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा करूया. त्यावेळी त्यांनी कांही उत्तर दिलं नाही. ते भाषण करायला उठले. आपलं भाषण वाचलं, कागद खाली ठेवले. आणि त्यांनी ११ मे हा ‘टेक्नॉलॉजी डे’ म्हणून घोषित केला. गेली वीस वर्षे हा दिवस साजरा होतो आहे. यांत विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या हृदयाचा आवाज ऐकून ही उत्स्फूर्तपणे घोषणा केली.

कार्यक्रम संपला आणि आम्ही चहापानासाठी चालत दुसऱ्या एका मंडपात चाललो होतो. अटलजीं माझ्याकडे वळले आणि मला म्हणाले ‘ अणुचाचणी झाल्यावर अमेरिका लगेच निर्बंध आणतील तंत्रज्ञानावर तसेच काही, निवडक उपकरणांवर. त्याचा आपणा सर्व शास्त्रज्ञांवर काय परिणाम होईल?’ मी त्यांना म्हटलं ‘सर, अमेरिकेने काहीही निर्बंध घालू देत. जोपर्यंत आम्ही शास्त्रज्ञ आमच्या मेंदूवर निर्बंध घालत नाही तोपर्यंत अमेरिका आपलं काही बिघडवू शकत नाही’. अटलजी जोरात हसले. थांबले. माझा हात आपल्या हातात घेऊन म्हणले “शाब्बास माशेलकरजी. याच भावनेनें आणि ऊर्जेने तुम्ही काम केलंत तर भारताला काहींचं चिंता नाही”.

तिसरा प्रसंग मला आठवतो तो २६ सप्टेंबर २००३ चा. हा सी.एस.आय.आर चा साठावा स्थापना दिवस होता. सी.एस.आय.आर ने एक पानभर अगदी वैशिष्ठ्यपूर्ण जाहिरात दिली होती. संबंध मोकळं पान त्यावर फक्त एका बोटाचा फोटो त्या बोटावर होतं मतदान केल्यावर लावलेल्या काळ्या शाईचा ठिपका. शाईचं तंत्रज्ञान तयार केलं होतं आमच्या एनपीएल या प्रयोगशाळेने. त्या पानावर एक वाक्य होतं. ‘सी.एस.आय.आर चं तंत्रज्ञान करोडो भारतीय मतदारांच्या बोटावर’.

अटलजींनी ही जाहिरात त्या दिवशीच्या वृत्तपत्रांत सकाळी पहिली होती आणि ती त्यांना फार आवडली होती. याचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. त्यांनी त्यांचं वाचायला दिलेलं भाषण बाजूला ठेवलं. आणि ‘ तंत्रज्ञान व लोकशाही ‘ या विषयावर उत्स्फूर्त भाषण केलं माझ्या आयुष्यात ऐकलेलं हे एक सर्वोत्तम भाषण म्हणेन.

तीन वेगवेगळ्या दिवसात पाहिलेली प्रेरणादायी , त्यांच्यासारखीच अगदी अटल अशी ही रूपं आजही डोळ्यासमोर लख्खपणे येतात. म्हणूनच मला वाटतं, अटलजी कायम आपल्यात आहेत! मी अटलजींची तीन वेगवेगळी रूपं. उत्स्फूर्त. निर्मल. संवेदनशील. भावपूर्ण. प्रेरणादायी. अटल.